व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

का येताहेत इतक्या नैसर्गिक विपत्ती?

का येताहेत इतक्या नैसर्गिक विपत्ती?

का येताहेत इतक्या नैसर्गिक विपत्ती?

अलीकडे विपत्तींबद्दलच्या बातम्यांना जणू उधाण आले आहे. पूर्वी कधी इतके लोक एकापाठोपाठ एक विपत्तींना बळी पडले नव्हते. बेल्जियम येथील विपत्ती संशोधन केंद्राच्या वृत्तानुसार एकट्या २०१० सालातच ३७३ विपत्ती आल्यात आणि त्यांत कमीतकमी २,९६,००० लोक आपल्या जिवास मुकले.

नोंद केल्या जाणाऱ्‍या विपत्तींच्या संख्येतही मागील काही दशकांत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. उदाहरणार्थ, १९७५ ते १९९९ या काळात दर वर्षी ज्यांची नोंद करण्यात आली अशा विपत्तींची संख्या ३०० पेक्षा बरीच कमी होती. पण, २००० ते २०१० यादरम्यान ती संख्या वर्षाला जवळजवळ ४०० पर्यंत पोचली. कदाचित बऱ्‍याच लोकांप्रमाणे तुम्हीही विचार करत असाल की ‘अलीकडे इतक्या विपत्ती का येत आहेत?’

बरेच लोक अशा दुर्घटनांना “देवाची करणी” म्हणत असले, तरी असे म्हणणे चुकीचे आहे. आज इतक्या लोकांवर परिणाम करत असलेल्या विपत्तींमागे देवाचा हात नाही. पण, आपल्या काळात अनर्थकारक घटना घडतील असे बायबलमध्ये पूर्वीच सांगण्यात आले होते एवढे मात्र खरे. उदाहरणार्थ, मत्तय २४:७, ८ यांत आपण येशूचे हे शब्द वाचतो: “जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. पण ह्‍या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत.” अशा घटना घडतील असे येशूने का सांगितले होते आणि आज या घटनांचा आपल्याकरता काय अर्थ होतो?

देवाचा पुत्र येशू, त्याला विचारण्यात आलेल्या या प्रश्‍नाचे उत्तर देत होता: “या गोष्टी केव्हा होतील, आणि . . . या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” (मत्तय २४:३) वर उल्लेख केलेल्या घटनांसोबतच त्याने इतर बऱ्‍याच घडामोडी घडतील असे सांगितले. त्यानंतर त्याने हे लक्षवेधक विधान केले: “या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.” (लूक २१:३१) त्याअर्थी, या नैसर्गिक विपत्ती अतिशय अर्थसूचक आहेत. त्या आपल्याला नजीकच्या भविष्यात घडणार असलेल्या मोठ्या परिवर्तनांचा इशारा देताहेत.

विपत्तींना कारणीभूत असलेल्या शक्‍ती

तरीसुद्धा, बरेच लोक विचारतात, जर या संकटांमागे देवाचा हात नाही, तर मग त्यांसाठी कोण किंवा काय जबाबदार आहे? या प्रश्‍नाचे उत्तर समजून घेण्यासाठी बायबलमध्ये सांगितलेले एक महत्त्वाचे सत्य ओळखणे गरजेचे आहे. ते म्हणजे, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) हे वचन दाखवते, की जगातील दुःखदायक परिस्थितीसाठी देव जबाबदार नाही. उलट, त्याचा “दुष्ट” शत्रू, ज्याला बायबलमध्ये “दियाबल” म्हटले आहे, तो सध्या घडत असलेल्या बऱ्‍याच विपत्तींसाठी जबाबदार आहे.—प्रकटीकरण १२:९, १२.

स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यास उत्सुक असलेल्या या देवाच्या शत्रूला लोकांच्या जिवाची मुळीच पर्वा नाही. सगळे जग त्याच्या कह्‍यात असल्यामुळे तो लोकांनाही अशीच वृत्ती बाळगण्याचे प्रोत्साहन देतो. हेदेखील बायबलमध्ये पूर्वीच सांगण्यात आले होते. त्यात म्हटले होते, की “शेवटल्या काळी” लोक “स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ,” होतील. (२ तीमथ्य ३:१, २) तेव्हा, दियाबलाने या व अशा इतर दुर्गुणांच्या बळावरच उभी असलेली एक जागतिक यंत्रणा निर्माण केली आहे याचे आपल्याला नवल वाटू नये. तोच लोकांना स्वार्थापोटी व धनाच्या लोभापोटी इतरांचा जीव धोक्यात घालण्याचे प्रोत्साहन देतो.

आजची धनलोभी जागतिक यंत्रणा कशा प्रकारे विपत्तींना कारणीभूत ठरते? जागतिक पातळीवरील विपत्तींसंबंधी संयुक्‍त राष्ट्रांचे एक वृत्त म्हणते: “बहुतेक ठिकाणी धोकादायक प्रदेशांत, उदाहरणार्थ पूर येण्याची जास्त शक्यता असलेल्या भागांत दाट लोकवस्ती आढळते. शिवाय, जंगलतोड आणि पाणथळ प्रदेशांच्या नाशामुळे विपत्तींचा प्रतिकार करण्याची पृथ्वीची नैसर्गिक क्षमता कमी होऊ लागली आहे. या सर्वांहून जास्त, मानवाच्या दुर्व्यवहारांमुळे पर्यावरणाला घातक असलेल्या विषारी वायूंचे प्रमाण वाढून, जागतिक हवामान बदल व समुद्राच्या पातळीत वाढ यांप्रकारचे धोके निर्माण झाले आहेत.” “मानवाचा हा दुर्व्यवहार” प्रामुख्याने आर्थिक प्रगतीच्या नावाखाली केला जात असला, तरी खरे पाहता आजच्या जगात सर्वत्र दिसून येणारी स्वार्थी व लोभी वृत्तीच त्याला प्रामुख्याने जबाबदार आहे.

परिणामस्वरूप, आज बरेच तज्ज्ञ हे कबूल करू लागले आहेत की सध्या घडत असलेल्या विपत्तींची तीव्रता मानवी दुर्व्यवहारांमुळे आणखीनच वाढली आहे. खरे पाहता, विपत्तींना कारणीभूत ठरणाऱ्‍या व्यवस्थेला पाठिंबा देण्याद्वारे माणसे आज दियाबलाच्या हातातील जणू प्यादे बनले आहेत.

तर मग, बऱ्‍याच विपत्ती माणसाच्या निष्काळजीपणामुळे व दुर्व्यवहारांमुळे घडून येतात हे उघड आहे. काही विपत्ती जेथे घडल्या तेथे न घडता इतर ठिकाणी घडल्या असत्या तर त्या इतक्या तीव्र नसत्या असे दिसून येते. जगाच्या बऱ्‍याच भागांत, दुष्ट व्यक्‍तींच्या काळ्या कृत्यांमुळे नैसर्गिक दुर्घटनांचे परिणाम अधिकच जाणवतात. तसेच, आजच्या जगात सर्रास दिसून येणाऱ्‍या आर्थिक व सामाजिक अन्यायामुळे बहुसंख्य लोकांना धोकादायक परिसरांत राहण्याशिवाय पर्याय नसल्यामुळेही विपत्तींचे दुष्परिणाम अधिकच वाढले आहेत. अर्थात, काही लोकांना विपत्तींना तोंड द्यावे लागते, ते कोणत्याही विशिष्ट व्यक्‍तीच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे नव्हे, तर केवळ “समय व प्रसंग” यांमुळे.—उपदेशक ९:११, पं.र.भा.

विपत्तींमागचे कारण कोणतेही असो, पण अशा एखाद्या नैसर्गिक विपत्तीला तुम्हाला तोंड द्यावे लागले तर तुम्ही काय करू शकता? विपत्तींचा आघात काहीसा कमी करण्यासाठी कोणती पावले उचलता येतील याविषयी आता पाहू या. (w११-E १२/०१)

[५ पानांवरील चित्र]

दाट लोकवस्ती

[५ पानांवरील चित्र]

जंगलतोड

[५ पानांवरील चित्र]

प्रदूषण

[५ पानांवरील चित्राचे श्रेय]

डावीकडे: © Mark Henley/Panos Pictures

मध्यभागी: © Jeroen Oerlemans/Panos Pictures