कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | तरुण
कसे मिळवाल खरे मित्र?
हे इतकं कठीण का?
तंत्रज्ञानामुळे अनेकांशी संपर्क साधणं आज पूर्वीपेक्षा खूपच सोईस्कर बनलं आहे. आणि त्यामुळे इतरांशी मैत्री करणं खूप सोपं झालं आहे. पण इतरांसोबत जोडलेल्या या नातेसंबंधात एक प्रकारचा पोकळपणा असल्याचं तुम्हाला जाणवेल. एक तरुण म्हणतो, “इतरांसोबत असलेल्या माझ्या मैत्रीत मला नेहमी एक प्रकारचा ठिसूळपणा जाणवतो; पण माझ्या बाबांच्या बाबतीत तसं नाही. त्यांचे अनेक असे मित्र ज्यांच्यासोबत त्यांची वर्षांनुवर्षांपासून मैत्री आहे.”
मग कायम टिकणारी आणि अर्थपूर्ण मैत्री विकसित करणं आज इतकं कठीण का झालं आहे?
तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत
तंत्रज्ञान याला काही प्रमाणात जबाबदार असू शकतं. आज मेसेजेस, चॅट, सोशल नॅटवर्किंग आणि इतर सोशल मिडियासारख्या माध्यमांमुळे मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष न भेटता मैत्री टिकवून ठेवणं शक्य आहे, असं अनेकांना वाटतं. शिवाय, अर्थपूर्ण संभाषणांची जागा आता झटपट आणि थोडक्यात केल्या जाणाऱ्या मेसेजेस आणि चॅटनी घेतली आहे. आर्टिफिशल मॅच्युरिटी नावाच्या पुस्तकात असं म्हटलं आहे, की “प्रत्यक्ष भेटून एकमेकांसोबत बोलण्याऐवजी इतर माध्यमांचा वापर करण्याकडे लोकांचा कल जास्त असल्याचं दिसून आलं आहे. विद्यार्थीदेखील एकमेकांसोबत वेळ घालवण्याऐवजी मोबाईल किंवा कंप्युटरसमोर तास न् तास वेळ घालवतात.”
तंत्रज्ञानामुळे कधीकधी आपल्याला वाटेल की इतरांसोबतची आपली मैत्री घनिष्ठ आहे. २२ वर्षांचा ब्रायन * म्हणतो, “मेसेज पाठवून मित्रांची विचारपूस करण्यात मीच जास्त पुढाकार घेत आहे असं मला अलीकडे जाणवत होतं. म्हणून त्यांच्यापैकी किती जण स्वतःहून माझी विचारपूस करतात हे पाहण्यासाठी मी त्यांना मेसेज करायचं बंद केलं. खरं सांगायचं तर त्यांच्यापैकी खूपच कमी जणांनी माझी विचारपूस केली. यावरून मला जाणवलं की ज्यांना मी माझे अगदी जवळचे मित्र समजत होतो ते मुळात माझे जवळचे मित्र नव्हतेच.”
मग मेसेज आणि सोशल मिडियाद्वारे मित्रांच्या संपर्कात राहून मैत्री घनिष्ठ करणं शक्य नाही असा याचा अर्थ होतो का? नक्कीच नाही. या गोष्टी मैत्रीला हातभार लावतातच, पण मैत्री घट्ट करण्याकरता त्यांच्यासोबत ऑफलाईन संपर्क (इलेक्ट्रॉनिक माध्यमांशिवाय थेट संपर्क) असणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सोशल मिडिया बऱ्याच वेळा दोन व्यक्तींमध्ये संपर्क साधण्याचं केवळ एक माध्यम असतं. त्यामुळे मैत्री घनिष्ठ होत नाही.
तुम्ही काय करू शकता?
मैत्रीची व्याख्या समजून घ्या. मित्र “आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (नीतिसूत्रे १८:२४) तुम्हालाही अशाच प्रकारचे मित्र हवे आहेत का? तुम्हीदेखील अशाच प्रकारचे मित्र आहात का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यास मदत व्हावी म्हणून तुमच्या मित्रामध्ये कोणते तीन गुण असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ते लिहून काढा. तसंच मैत्री टिकवून ठेवण्यासाठी तुमच्यामध्ये असणारे कोणते तीन गुण तुम्हाला चांगले वाटतात तेही लिहून काढा. मग स्वतःला असं विचारा: ‘मित्रांमध्ये ज्या गुणांची अपेक्षा मी करतो ते गुण माझ्या कुठल्या ऑनलाईन मित्रांमध्ये आहेत? आणि मैत्रीला हातभार लावतील असे कोणते गुण माझ्यात आहेत असं माझ्या मित्रांना वाटतं?’—बायबलचं तत्त्व: फिलिप्पैकर २:४.
महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. ऑनलाईन मैत्री सहसा एकसारख्या आवडीनिवडींवर आधारलेली असते. जसं की, एखादा छंद. पण, एकसारख्या आवडीनिवडींपेक्षा समान नैतिक मूल्य असणं फार महत्त्वाचं आहे. २१ वर्षांची लिअॅन म्हणते, “मला जास्त मित्र-मैत्रिणी नाहीत, पण जे आहेत ते मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत करतात.”—बायबलचं तत्त्व: नीतिसूत्रे १३:२०.
लोकांना प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करा. प्रत्यक्ष भेटून बोलल्यामुळे जे साध्य होतं, ते इतर कोणत्याही मार्गांनी होत नाही. एकमेकांसोबत प्रत्यक्ष बोलताना समोर असणाऱ्या व्यक्तीच्या आवाजात, चेहऱ्यावरील हावभावात आणि देहबोलीमध्ये होणारा अगदी हलक्यातला हलका बदलदेखील आपण ओळखू शकतो.—बायबलचं तत्त्व: १ थेस्सलनीकाकर २:१७.
पत्र लिहिण्याचा प्रयत्न करा. पत्र आता जुन्या जमान्यातली गोष्ट बनली आहे असं कदाचित तुम्हाला वाटेल. पण पत्र लिहिण्याद्वारे हे दिसून येईल की एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला मनापासून काळजी आहे, आणि तुम्हाला तुमचं पूर्ण लक्ष त्या व्यक्तीवर केंद्रित करण्याची इच्छा आहे. अशा प्रकारे एखाद्याकडे व्यक्तिगत लक्ष देणं आजच्या धावपळीच्या जगात क्वचितच पाहायला मिळतं. उदाहरणार्थ, शॅरी टर्कल हिनं अलोन टुगेदर या पुस्तकात एका तरुणाबद्दल लिहिलं आहे. हा तरुण सांगतो, की त्याला कोणीही कधीच पत्र लिहिलं नव्हतं. ज्या काळात लोक सहसा पत्र लिहायचे, त्या काळाविषयी तो म्हणतो, की “मी त्या काळातला नसलो, तरी त्या काळाची कमी मला आज जाणवते.” मग मैत्री करण्यासाठी या ‘जुन्या तंत्रज्ञानाचा’ वापर करू नये का?
तात्पर्य: खरी मैत्री टिकवून ठेवण्यासाठी फक्त संपर्कात असणंच पुरेसं नाही; तर त्यासाठी तुम्ही आणि तुमच्या मित्रानं प्रेम, समजंसपणा, धीर आणि क्षमाशीलता यांसारखे गुण दाखवले पाहिजेत. या गुणांमुळे तुम्हाला तुमच्या मैत्रीतलं नातं आणखी घट्ट करता येईल. फक्त ऑनलाईन चॅट केल्यामुळे असे गुण दाखवणं शक्य नाही. ▪ (g16-E No. 1)
^ परि. 8 या लेखात काही नावं बदलण्यात आली आहेत.